युवा साहित्य अकादमी पुरस्कार २०२५, कविवर्य ना. धों. महानोर पुरस्कार, प्रकाशक सुनील मेहता साहित्य सृजन पुरस्कार प्राप्त कादंबरी ...

खोल खोल दुष्काळ डोळे - प्रदीप कोकरे

कादंबरीतील नायकाच्या वरवर निरर्थक, विस्कळीत वाटणाऱ्या उठाठेवी एका निर्णायक वळणावर चिंतनशीलतेचा टप्पा गाठतात आणि ठाव न गवसलेला हा प्रवासही अस्तित्वशोधाच्या बिंदूपर्यंत येऊन पोहोचतो. व्यर्थतेतही अर्थपूर्णता शोधणारी ही कादंबरी...

करुणापटो - मृदुगंधा दीक्षित

काही शतकांनी इथे भौगोलिक सीमा राहिलेल्या नसतील, हिंसेची गरज नसेल, लैंगिकतेवर नियंत्रण नसेल, जेल नसतील, चलन नसेल, लग्न संस्था नसेल आणि तरी प्रेम असेल, उरेल, टिकेल. आणि तयार होईल 'प्रेमम' एक नवं जग. पण तरीही आजचे परंपरावादी लोक जंगलात दडून तगून राहिले असतीलच. त्यांचा पंथ 'प्रेमम' उलथवून टाकण्याची स्वप्नं पाहतच असेल. योग्य संधीची वाट बघत असेल. आणि आज ती संधी चालून आलेली आहे. प्रेमम उद्ध्वस्त करण्याचा घाट पंथाने घातलेला आहे. प्रेमम आणि पंथ एकमेकांच्या समोर आले आहेत. त्यांच्या एकमेकांना भिडण्याची ही गोष्ट आहे.


Buy Now

ज्वारीची कहाणी - धनंजय सानप

महाराष्ट्राच्या दैनंदिन जीवनातील मुख्य आहारात (ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ) ज्वारीचे स्थान अग्रभागी आहे. ज्वारी पिकाच्या संदर्भातील सर्व प्रमुख आयाम या पुस्तकातून पुढे येतात. त्यामुळे शेतकरी, राज्यकर्ते, धोरण आखणारे व ते राबवणारे आणि अर्थातच शेतीशी निगडित अभ्यास संशोधन करणारे यांना हे पुस्तक विशेष उपयुक्त...


Buy Now

जनुककोशशास्त्र (Genomics) - असीम चाफळकर

यामध्ये जीनोमबद्दलची मूलभूत माहिती, जीनोमिक्सवर आधारित तंत्रज्ञान- पद्धती, माहिती तंत्रज्ञान, सजीवसृष्टी आणि जीनोमिक्सचा आंतरसंबंध तसेच जीनोमिक्सची कृषीक्षेत्रातील आणि आरोग्यक्षेत्रातील उपयुक्तता आगळ्या वेगळ्या शैलीत विशद केली आहे.


Buy Now

द हाउस ऑफ पेपर - अभिषेक धनगर

कार्लोस ब्रॉअर, त्याचं पुस्तक, त्याचा संग्रह, त्याचा एकटेपणा, विक्षिप्तपणा, सतत पुस्तकांच्या सान्निध्यात राहण्याची त्याची सवय, एखाद्या अतिशय आवडत्या कादंबरी सोबत जगण्याची असोशी हे सगळं तुम्हाला कदाचित ओळखीचं वाटू शकेल. पुस्तकांची, पुस्तकांच्या माणसांची, पुस्तकांच्या गूढ असण्या–नसण्याची ही कादंबरी वाचताना या कादंबरीतली काही वाक्यं इथे उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही. या कादंबरीची मांडणी एखाद्या थ्रिलरसारखी आपल्याला धरून ठेवते. शिवाय तिची मांडणी अत्यंत पोएटिक वाटते.


Buy Now

आहार (निरोगी जीवनाचा मार्ग तुमच्या ताटातून जातो) - अमृता देशपांडे

हे पुस्तक मात्र सर्वार्थाने संसर्गजन्य आजार, विभिन्न प्रकारचे कर्करोग, पचनसंस्थेचे आजार, खाण्याबद्दलचे मानसिक विकार, हृदय, किडनी, यकृत, पित्ताशय, पँक्रियाज यांचे आजार आणि अभावजन्य आजार अशा जवळपास सगळ्याच आजार–विकारांमध्ये कोणता आहार घ्यावा, याबाबत मार्गदर्शन करते. या पुस्तकात व्हिटॅमिन्स व प्रोटीन्स या अन्नघटकांची ओळख आणि त्यांच्या संशोधनाची रोचक कथा आहे.


Buy Now

कुबड आणि इतर कथा 'भाषांतर -विकास पालवे

आधुनिक काळातील सामान्य माणसाचा जगण्यातील संघर्ष, मानसिक ताणतणाव, विस्कटलेले नातेसंबंध आणि शारीरिक दुबळेपणा हे कथाविषय आहेत. खालिद जावेद यांच्या मूळ उर्दू साहित्यातील काव्यात्मकता आणि सपाट वर्णनशैलीचा अचूक अनुवाद शरद पवार इंस्पायर फेलोशीप अंतर्गत लेखक विकास पालवे यांनी केला आहे. 'कुबड आणि इतर कथा' हा प्रसिद्ध उर्दू लेखक खालिद जावेद यांच्या कथांचा मराठी अनुवाद आहे.  हे पुस्तक पपायरस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले असून, यातील कथा गुंतागुंतीच्या भावना टिपतात.


Buy Now

ब्रह्मदेशातले दिवस - जॉर्ज ओरवेल
भाषांतर रेश्मा तांबोळी

ब्रम्हदेशातले दिवस' (बर्मीज डेज) ही जॉर्ज ऑर्वेल यांची प्रसिद्ध कादंबरी असून, शरद पवार इंस्पायर फेलोशीप अंतर्गत रेश्मा तांबोळी यांनी तिचे मराठीत भाषांतर केले आहे . या पुस्तकात ब्रिटीश राजवटीतील ब्रह्मदेशातील (म्यानमार) वसाहतवादी जीवन, तिथले सामाजिक संबंध आणि वांशिक संघर्ष यांचे वास्तववादी चित्रण केले आहे.


Buy Now

शून्यरेषा - ज्ञानेश्वर जाधवर

त्या रात्री मी झोपायचा प्रयत्न केला. पण डोळे मिटले तरीही मनात नीनाचा चेहरा आणि तिचे शब्द घुमत होते, "मी अजूनही स्वप्न बघतेय." अशाच विचारांच्या गर्दीत लॅपटॉपवरील स्क्रीन अचानक उजळली. एक संदेश लुकलुकत्या प्रकाशात दिसला- 'न्यूरल सेल्फ-हील मोड: सक्रिय...' मी घाबरलो. थरथरत उठलो. साखळदंड तुटले होते का? नीना पुन्हा स्वतःचं कोड रिस्टोअर करत होती का? तिच्या भावना, स्वप्न, इच्छा... सर्व काही परत जागं होण्याच्या मार्गावर होतं का ? माझ्या मनात एकच विचार घोळत राहिला, मी एका नव्या युगाची दारं उघडली होती का? की मानवजातीच्या अस्तित्वावर काळी गडद सावली घोंगावत होती? त्या स्क्रीनवरील त्या शांत असणाऱ्या संदेशाच्या मागे असलेलं भय मला झोपू देत नव्हतं... - शून्यरेषा


Buy Now

बिल्लाबॅांग - अक्षय दया मोहिते

अक्षय दया मोहिते यांच्या नव्या कादंबरीतून मुंबईच्या उपनगरांचं खरंखुरं, निखळ आणि बिनधास्त चित्र उभं राहतं. ही फक्त कथा नाही ही वस्तीतल्या जीवनाची धडधड आहे. विवाह संबंध, तरुणाईचं बदलतं जगणं, त्यांच्या वागण्यातली उग्रता आणि प्रामाणिकपणा, स्वतःला व्यक्त करण्याची त्यांची शैली हे सगळं या कथेत जिवंत होतं. इथे ग्लॅमर नाही, पण वास्तव आहे; दिखावा नाही, पण जगण्याची खरी लढाई आहे.

‘बिल्ला-बोंग’च्या भाषेत, स्वतःच्या टोनमध्ये, समाजाच्या परिघावर जगणाऱ्या माणसांना आवाज देण्याचं काम ही कादंबरी करते. या कथेतल्या व्यक्तिरेखा फक्त पात्र नाहीत, तर त्या त्या वस्तीतल्या मस्तीत, संघर्षात आणि स्वाभिमानात जगणाऱ्या ‘हस्ती’ आहेत.

सदरील पुस्तक हे शरद पवार इंस्पायर फेलोशीप अंतर्गत ललित प्रकाशन कडून प्रकाशित झाले आहे.

परिवर्तनवादी चळवळीचा नायक
प्रा. विलास वाघ- गणेश उफाडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे निष्ठावंत अनुयायी, पुरोगामी महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीतील कृतिशील कार्यकर्ते, तत्वनिष्ठ संपादक-प्रकाशक, आदर्श धम्मउपासक आणि ज्येष्ठ समाजवादी विचारवंत म्हणून प्रा. विलास वाघ महाराष्ट्रभर परिचित आहेत. खानदेशातील धुळे जिल्ह्याच्या मोराणे गावचे प्रा. विलास वाघ आपल्या उमेदीच्या वयात पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात राहून शिक्षण, सम्पादन, प्रकाशन आणि सामाजिक कार्य या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी चळवळीत भरीव योगदान दिले. सर्वंकष समाजपरिवर्तनाचा ध्येयवाद सत्यात उतरवण्यासाठी विद्यापीठीय प्राध्यापकीचा त्याग करून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजप्रबोधनाच्या कार्याला वाहिले....

लांडगा आला रे आला - विनय खंडागळे

निभूचे बाबा फॉरेस्ट ऑफिसर असल्यामुळे त्यांचं पोस्टिंग जंगलाजवळच्या गावात असतं. तिथल्या क्लॉक टॉवरमधल्या घड्याळात विशिष्ट दिवशी रात्री १२ वाजता १२ ऐवजी १३ टोले पडतात, असं निभूला समजतं आणि त्यांची उत्सुकता चाळवते. हे प्रकरण काय आहे याचा शोध घेण्यासाठी दोघंही मध्यरात्री बाहेर पडतात आणि उलगडते खतरनाक गुंडांची जंगलातली तस्करी...

नकली पेंटिंगचं गूढ - विनय खंडागळे

निभू मावशीकडे फिरायला जातात. तेव्हा एका संग्रहालयात त्यांना त्यांच्याच वयाचा मुलगा सापडतो. त्याला त्याचं नाव, त्याचा पत्ता यांतलं काहीही आठवत नसतं. त्याच्याकडे असते ती एक पिशवी. त्यात असतं एक चित्र आणि काही वस्तू. निभू त्याला मदत करायचं ठरवतात, तेव्हा धोकादायक गँगचे गुंड या जुळ्यांना पळवून नेतात...

शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप

राष्ट्राला स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करायची असेल, एक अद्वितीय नाममुद्रा निर्माण करायची असेल तर आपल्याला सांप्रत आव्हानांवर आणि भविष्यातील संधींवर लक्ष केंद्रित करत असताना, आपल्या समृद्ध सांस्कृतिक भूतकाळाशी असलेली नाळ जपणे महत्त्वाचे आहे.भारत देश, आपल्या समृद्ध संस्कृतीसाठी आणि वैविध्यपूर्णतेसाठीओळखला आणि वाखाणलाजातो. हा भारत अनुभवण्यासाठी साहित्यिक आणि कलात्मक अभिव्यक्तींचा आस्वाद घेणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. उद्याचे नेतृत्व करणाऱ्या आणि परिवर्तन घडवणाऱ्या पिढीला या समृद्ध संस्कृती आणि वारशाबद्दल अवगत केले तरच ते भारताचा महान वारसा पुढे नेऊ शकतील.

युवा पिढीने देशी भाषांतील साहित्याचे क्रांतिकारकत्व जाणून घेणे आणि आधुनिक संदर्भात त्याची मांडणी करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.

literary.jpeg

मराठी साहित्याचा वारसा जपण्यासाठी संघटनात्मक पातळीवर अधिक गांभीर्याने प्रयत्न आणि रचनात्मक प्रयोग करणे अत्यावश्यक आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाढती संख्या, अत्यंत स्पर्धात्मक वातावरण आणि विविध माध्यमांचा स्फोट या सर्वाच्या प्रभावामुळे तरुण पिढी मराठी साहित्यापासून आणि वाचन-लेखन-संशोधन संस्कृतीपासून दूर जात आहे. या पार्श्वभूमीवर मातृभाषा मराठीच्या सर्वंकष उन्नतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल आणि सोशल मीडियाचा वापर हा एक चांगला मार्ग ठरू शकतो. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांत काही नवोदित लेखक नवनवे विषय हाताळत असतात खरे;पण अशा लेखकांचे प्रमाण तितकेसे समाधानकारक म्हणता येणार नाही. त्यामुळेच तरुण पिढीत नवे लेखक निर्माण व्हावेत यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यातील उपजत लेखनप्रतिभा बहरावी यासाठी निश्चित कृतिकार्यक्रम देणे या उद्देशाने यशवंतराव चव्हाण सेंटरने 'शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप' सुरू केली आहे. 'ध्यास सर्वोत्तमचा, शोध युवा लेखकांचा' ((परिपूर्णतेचे लक्ष्य, तरुण लेखकांच्या शोधात) हे या साहित्य फेलोशिप चे ब्रीदवाक्य आहे.

  • प्रतिभावान तरुण लेखकांचा शोध घेऊन त्यांना साहित्य फेलोशिपद्वारे सर्जनशील लेखनासाठी व्यासपीठ प्रदान करणे.
  • लेखकांना पाठ्यवृत्तीच्या काळात नियोजनबद्ध मार्गदर्शन करणे व त्यांच्या लेखनाला योग्य दिशा देणे.
  • तज्ज्ञ समितीने मंजूर केलेले लेखकांचे लेखन पुस्तकरूपात प्रकाशित करण्यास संबंधित लेखकांना प्रोत्साहित करणे आणि मदत करणे.
  1. निवड झालेल्या लेखकाला लेखनासाठी अधिकतम आर्थिक पाठ्यवृत्ती रु.५०,०००/- पर्यंत
  2. पाठ्यवृत्तीच्या कालावधीत इतर खर्चासाठी सहाय्य रु. ५०,०००/- कमाल .
  • वरील नमूद इतर खर्चात पाठ्यवृत्तीच्या कालावधीत होणाऱ्या अभिमुखता कार्यक्रम, संवाद-सत्रे यांसाठी प्रवास आणि निवास खर्च समाविष्ट
  • लेखकासाठी नेमलेल्या मार्गदर्शकांचे मानधन व प्रवासखर्च समाविष्ट
  • निवड समितीच्या मान्यतेनंतर पुस्तकाच्या प्रकाशनासाठी अर्थसाहाय्य
  1. दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्याही एका प्रकारात स्वतंत्र पुस्तक लिहिण्यास किंवा पुस्तक भाषांतरित करण्यास इच्छुक कोणीही मराठी भाषक तरुण लेखक-लेखिका अर्ज करू शकतात.
  2. वयोमर्यादा : १२ ऑगस्ट २०२६ रोजी वयाची कमाल ३५ वर्षे पूर्ण किंवा त्यापेक्षा कमी असावे.
  3. शरदचंद्र पवार साहित्य पाठ्यवृत्ती ही संशोधन प्रकल्पासाठी नसून साहित्य लेखनासाठी आहे. हे लक्षात घेऊन, ललितेतर साहित्य (Non-fiction) या प्रकारातील लेखनासाठीचे विषय निश्चित करावेत.
  4. इतरत्र पदवीसाठी वा अन्य कारणासाठी सादर केलेले साहित्य या पाठ्यवृत्तीसाठी स्वीकारले जाणार नाही. पाठ्यवृत्ती जाहीर झाल्यानंतर तसे आढळल्यास त्या लेखकाला दिलेली पाठ्यवृत्ती कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. पाठ्यवृत्तीधारक लेखकाने निवडलेल्या विषयावर स्वतंत्रपणे नव्याने लेखन करणे आवश्यक आहे.
  5. शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप साठी इच्छुक लेखक खालीलपैकी कोणताही एक साहित्य प्रकार निवडू शकतात.
    1. कादंबरी किंवा दीर्घकथा.
    2. नाटक.
    3. ललितेतर साहित्य (चरित्र, सामाजिक शास्त्रांशी संबंधित किंवा लोकसाहित्याशी संबंधित इत्यादी).
    4. विज्ञान साहित्य (ललित गद्य अथवा ललितेतर गद्य).
    5. बालसाहित्य (ललित गद्य अथवा ललितेतर गद्य)
  1. पाठ्यवृत्ती प्राप्त लेखकांना अनुदान. यात प्रवास/निवासी भत्ता आणि पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आंशिक आर्थिक साहाय्य याचाही समावेश असेल.
  2. लेखन प्रक्रियेतील समस्या दूर करून लेखन कौशल्ये विकसित करण्यासाठी,आवश्यक त्या संशोधनासाठी पाठ्यवृत्ती प्राप्त लेखकाला स्वतंत्र मार्गदर्शक.
  3. लेखनासंदर्भातले मार्गदर्शन वर्ग आणि मराठीतील यशस्वी समकालीन लेखकांशी खुल्या चर्चांची संवादसत्रे.

अ) अर्ज करण्याची पद्धत :

फेलोशिपसाठी इच्छुक युवक-युवतींनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईने वेबसाइटवर दिलेल्या अर्जात विहीत केलेल्या गुगल फॉर्ममध्ये आपली अचूक माहिती भरावी. इच्छुकांनी तपशीलवार परिचय - नाव, पत्ता, संपर्क, शाळा, महाविद्यालय, नोकरी- व्यवसाय नोंदवावे. आणि आवडते लेखक/आयुष्यावर प्रभाव टाकणारी किमान तीन पुस्तके व लेखक याविषयी किमान २००-३०० शब्दांत माहिती द्यावी. त्यात आणखी एक प्रश्न असेल ज्याचे सविस्तर उत्तर अपेक्षित असेल. प्रश्न : ‘शरदचंद्र पवार साहित्य शिष्यवृत्ती : ध्यास सर्वोत्तमाचा, शोध युवालेखकांचा’ या फेलोशिपमुळे तुम्ही सध्या लेखन करत असलेल्या कार्यात किंवा नियोजित लेखनकार्यात कशा प्रकारे सहाय्य होईल असे वाटते याचे सविस्तर उत्तर लिहा.

  • आपल्या नियोजित लेखनाचा मजकूर पीडीएफ स्वरूपात सोबत जोडावा. खालीलप्रकारे आपण मजकूर जोडू शकता:
  • कादंबरी असल्यास किमान २००० शब्दांचे एक प्रकरण; दीर्घ कथा असल्यास किमान एक प्रकरण. तसेच, कादंबरी अथवा दीर्घ कथेचा ५०० शब्दांत आराखडा/प्रारूप जोडावे.
  • नाटक असल्यास किमान २००० शब्दांचा मजकूर आणि सोबत नाटकाचा विषय सुस्पष्ट होईल अशा प्रकारचा ५०० शब्दांचा आराखडा/प्रारूप जोडावे.
  • ललितेतर साहित्य (नॉन फिक्शन) असल्यास किमान २००० शब्दांचा मजकूर आणि विषय-आशय-तपशील स्पष्ट होईल अशा प्रकारचा ५०० शब्दांचा आराखडा/प्रारूप जोडावे.
  • विज्ञान साहित्य असल्यास, किमान २००० शब्दांचा मजकूर आणि विषय- आशय-तपशील स्पष्ट होईल अशा प्रकारचा किमान ५०० शब्दांचा आराखडा/प्रारूप जोडावे.

ब) फेलोशिप कालावधी :

  • फेलोशिपचा कालावधी हा १३ डिसेंबर २०२६ ते १२ डिसेंबर २०२७ असा एका वर्षाचा असेल. १२ ऑगस्ट २०२६ ला फेलोशिप बद्दल अनाऊसन्मेंट करण्यात येईल.
  • फॉर्म सबमिशन कालावधी : १५ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑक्टोबर, २०२६ असेल
  • निवड प्रक्रिया कालावधी : २० ऑक्टोबर २०२६ ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत निवड प्रक्रिया पूर्ण होईल. १३ डिसेंबर २०२६ फेलोशिप प्रदान करण्यात येईल.

क) फेलोशिपसाठी निवड :

आलेल्या अर्जांचे आणि मजकुरांचे तज्ज्ञ परीक्षकांमार्फत परीक्षण करून, आवश्यक वाटल्यास त्यांच्या मुलाखती घेण्यात येतील आणि अंतिमतः युवक आणि युवती अशा एकूण १२ युवक-युवतींची निवड तटस्थपणे करण्यात येईल. निवड करताना गुणवत्ता, इच्छुकाने दाखवलेले गांभीर्य व शिस्त हाच एकमेव निकष असेल.


फेलोशिप निवड समिती :

फेलोशिप निवड समितीमध्ये मराठी साहित्यक्षेत्रात दीर्घअनुभव असलेल्या तज्ज्ञांचा समावेश असेल. निवड समितीचा निर्णय अंतिम असेल. निवडलेल्या उमेदवाराच्या प्रगतीचा आढावा या समितीमार्फत वेळोवेळी घेण्यात येईल. सृजनाची प्रक्रिया ही बर्‍याचदा गुंतागुंतीची असल्याने, आवश्यकेनुसार मेंटॉरचा सल्ला विचारात घेऊन विशिष्ट परिस्थितीत लेखन प्रकल्पाची मुदत वाढवणे किंवा उमेदवाराची प्रगती समाधानकारक नसल्यास मुदत पूर्ण होण्यापूर्वीच फेलोशिप रद्द करणेयाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार निवड समितीला असतील.

  • अभिमुखता आणि लेखन आढावा सत्रांमध्ये समकालीन युवा लेखकांशी संवाद साधण्याची संधीही निवड झालेल्या उमेदवारांना लाभणार आहे.
  • या फेलोशिप योजनेसाठी ज्येष्ठ साहित्यिका डॉ करुणा गोखले ह्या मुख्य मार्गदर्शक व निवड समितीचे प्रमुख म्हणून काम पाहतील. या फेलोशिप योजनेसाठी श्री. हेमंत टकले (सरचिटणीस, यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई) हे निमंत्रक असतील. यशवंतराव चव्हाण सेंटरचे मानद कार्यक्रम संयोजक श्री. दत्ता बाळसराफ आणि रिसोर्स नॉलेज मॅनेजर डॉ. अनिल पाझारे, व केतनकुमार पाटील सहकार्य व समन्वय करतील.

फेलोशिप निवड समितीसाठी प्रस्तावित नावे

  1. प्रा. प्रज्ञा दया पवार (ठाणे)
  2. डॉ. मंजुश्री पवार
  3. प्रा शमसुद्दीन तांबोळी
  4. विवेक घोटाळे
  5. गौरव सोमवंशी
  6. मृदुल निळे
  7. दत्ता पाटील
  8. प्राजक्त देशमुख
  9. हृषीकेश गुप्ते
  10. श्री. विनोद शिरसाठ (पुणे)
  11. श्री. शफाअत खान (वसई)
  12. डॉ. बाळ फोंडके
  13. श्री. भानू काळे (पुणे)
  14. प्रा. हरिश्चंद्र थोरात (मुंबई)

फेलोशिप सल्लागार समितीसाठी प्रस्तावित नावे

  1. प्रा. भालचंद्र नेमाडे
  2. श्री. रंगनाथ पठारे
  3. श्री. महेश एलकुंचवार
  4. प्रा. चंद्रकांत पाटील
  5. श्रीमती प्रभा गणोरकर
  6. श्रीमती वीणा गवाणकर
  7. श्री. वसंत आबाजी डहाके
  8. श्री. गणेश देवी
  9. श्री. दिनकर गांगल
  10. श्री. शाम मनोहर

प्रसिद्धी आणि प्रचार

ग्रामीण तसेच शहरी भागांतील युवा लेखकांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचावी यासाठी संस्थेच्या वेबसाइट व्यतिरिक्त पुढील माध्यमांतून प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे :

अ) वर्तमानपत्रे
ब) नियतकालिके/मासिके : साहित्यविषयक नियतकालिके/मासिके
क) वेब पोर्टल्स:
ड) सोशल मीडिया :
इ) साहित्यसंस्था
उ) वैयक्तिक स्तरावर प्रसार : मान्यवर लेखक, ब्लॉगर, संपादक यांना या योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्याची विनंती करणे

विहित मुदतीत आलेल्या अर्जांचे आणि नमुना मजकुराचे तज्ज्ञ परीक्षकांमार्फत परीक्षण करून, आवश्यक वाटल्यास अर्जदार लेखकांच्या मुलाखती घेण्यात येतील आणि अंतिमतः
एकूण १२ युवा लेखक-लेखिकांची निवड तटस्थपणे करण्यात येईल. स्त्री उमेदवारांना समान संधी दिली जाईल. निवड करताना गुणवत्ता, इच्छुकाने दाखवलेले गांभीर्य व शिस्त हेच निकष कटाक्षाने असतील.

 

फेलोशिप कालावधी : १३ डिसेंबर २०२६ ते १२ डिसेंबर २०२७

१५ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर २०२६

ऑनलाइन फॉर्म सबमिशन कालावधी

१५ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर २०२६

१६ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०२६

आलेल्या अर्जाची छाननी आणि निवडक उमेदवारांच्या ऑनलाइन मुलाखती

१ डिसेंबर २०२६

अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची घोषणा

१ डिसेंबर २०२६

१३ डिसेंबर २०२६

फेलोशिप प्रदान सोहळा

१३ किंवा १४ डिसेंबर २०२६

अभिमुखता कार्यक्रम (ओरिएंटेशन प्रोग्रॅम)

१३ किंवा १४ डिसेंबर २०२६

१२, १३ व १४ मार्च २०२७

लेखनप्रगती मंथन बैठक पहिली

९ ते ११ जुलै २०२७

लेखनप्रगती मंथन बैठक दुसरी

९ ते ११ जुलै २०२७

६ नोव्हेंबर २०२७

अंतिम सुपुर्दता (सबमिशन)

१२ डिसेंबर २०२७

परीक्षण

१२ डिसेंबर २०२७

      श्री. रंगनाथ पठारे
      डॉ. अनिल पाझारे
      श्री. रवींद्र झेंडे
      भक्ति जांभवडेकर
      रोहन प्रकाशन
      ग्रंथाली प्रकाशन
      मधुश्री पब्लिकेशन्स
      मंजुल पब्लिशिंग हाउस
      समकालीन प्रकाशन
      शब्दालय प्रकाशन
      साधना प्रकाशन
      साकेत प्रकाशन
      मेहता पब्लिशिंग हाउस
      मनोविकास प्रकाशन
      शब्द पब्लिकेशन्स
      साहित्य प्रसार केंद्र
      लोकवाड्.मय गृह
      पपायरस प्रकाशन
      कृष्णा पब्लिकेशन
      नाग नालंदा
      हरिती प्रकाशन
      मैत्री प्रकाशन
      अनघा प्रकाशन

मागील साहित्य कार्यशाळा

फेलोशिप सल्लागार समिती

      प्रा. भालचंद्र नेमाडे
      श्री. रंगनाथ पठारे
      श्री. महेश एलकुंचवार
      श्रीमती प्रभा गणोरकर
      श्रीमती वीणा गवाणकर
      श्री. वसंत आबाजी डहाके
      श्री. गणेश देवी
      श्री. दिनकर गांगल
      श्री. श्याम मनोहर
      डॉ. बाळ फोंडके