शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिपची “लेखन कार्यशाळा” राजस्थान भवन, वाशी येथे पार पडली. यासाठी मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. नितीन रिंढे, दत्ता बालसराफ, गणेश विसपुते, प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे, डॉ. करुणा गोखले, राजीव नाईक, डॉ. मुकुंद कुळे, किरण येले, डॉ. अनिल पझारे आणि रवींद्र झेंडे उपस्थित होते.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात दत्ता बाळसराफ यांनी नवोदित लेखकांच्या साहित्यप्रकारातील प्रगतीचा आढावा घेतला. त्यातील बदल, गुण-दोषांची चर्चा झाली, आणि ज्येष्ठ साहित्यिक व मार्गदर्शकांनी मोलाचे मार्गदर्शन केले. लेखन प्रक्रिया, विचारशीलता, सृजनशीलता, भाषेचे सौंदर्य आणि विविध संदर्भांची सखोल चर्चा झाली. या फेलोशिपमधून नवीन प्रवाह, समकालीन प्रश्नांवर वेगळी भूमिका घेणारे लेखक उदयास येतील, आणि मराठी साहित्यात दर्जेदार निर्मिती होईल, अशी अपेक्षा आहे.
समारोप कार्यक्रमात सर्व मार्गदर्शकांनी नवलेखकांसोबत वैयक्तिक व गटचर्चा केली. शेवटचा लिखाणाचा खर्डा, अंतिम बदल आणि पुढील प्रक्रिया यावर सविस्तर चर्चा झाली. वाचन, लेखन, दृश्य माध्यमे आणि नियतकालिकांमधील अभिरुचीचा उहापोह झाला. “मराठी साहित्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे.” या शब्दात नवोदित लेखकांनी यशवंतराव चव्हाण सेंटरचे आभार मानले, तर प्रा. नितीन रिंढे आणि दत्ता बाळसराफ यांनी प्रोत्साहन दिले. मार्गदर्शकांनी नवलेखकांच्या कामाचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.